रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येणारी (कै.) मृणाल हेगशेट्ये स्मृती राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा यंदा १६ ऑगस्ट रोजी होणार आहे. कै. मृणाल हेगशेट्ये आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा ही महाराष्ट्रातील एक दर्जेदार स्पर्धा म्हणून ओळखली जाते. दर वर्षी या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपर्याहतून विद्यार्थी सहभागी होतात. ३५ वर्षांहून अधिक काळ ही स्पर्धा सुरू आहे.
ही स्पर्धा तीन गटांत होणार असून तालुकास्तरीय माध्यमिक गटासाठी अंतराळ संशोधक डॉ. विक्रम साराभाई, अंधश्रद्धा - एक सामाजिक कीड, आदर्श शिक्षणाची माझी संकल्पना, सोशल मीडिया आणि तरुणाई असे विषय आहेत. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे १५००, १०००, ७५० रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.
आरक्षण आणि वास्तव, महाराष्ट्राचे शिल्पकार शंकरराव चव्हाण, भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने, नवे शैक्षणिक धोरण, महासत्तेच्या दिशेने असे विषय जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी आहेत. यातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे २०००, १५००, १००० रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.
वारीची प्रबोधन चळवळ, आर्थिक कोंडी आणि जागतिक महायुद्ध, गांधी समजून घेताना..., गदिमा - एक साहित्यरत्न असे विषय राज्यस्तरीय वरिष्ठ गटासाठी आहेत. प्रथम क्रमांकाला ५०००, द्वितीय क्रमांकाला ३००० आणि तृतीय क्रमांकाला २००० रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.